अलिबाग (प्रतिनिधी): गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील ग्रीन अलिबाग या संस्थेने दत्त टेकडी,कुरूळ येथे वृक्षारोपण केले. यंदा साधारण १०० करंज व वडाची झाडे संस्थेतर्फे लावण्यात आली. फक्त वृक्षारोपण नव्हे तर वृक्ष संवर्धन देखील तितकेच महत्वाचे मानून गत वर्षी लावलेल्या झाडांना जगवण्याचे काम संस्थेमार्फत केले गेले आहे. ‘झाडें लावा, झाडें जगवा, पाणी वाचवा’ याचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार जनमानसात व्हावा आणि विशेषकरून तरुणाईचा सहभाग यामध्ये वाढावा यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. भविष्यात वृक्षारोपण, संवर्धन या बरोबरच वृक्ष साक्षरता व जल साक्षरता वाढावी या उद्देशाने शाळांमध्ये उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
लहान मुलं आपल्या अनुकरणातून शिकत असतात. आपण पुढच्या पिढीला काही चांगलं शिकवलं नाही, चांगलं दिलं नाही तर आपल्या सर्वांच्या शिक्षित असण्याचा काही उपयोग नाही असे यावेळी संस्थेतर्फे प्रसाद मुळुस्कर यांनी सांगितले. तसेंच जास्तीत जास्त जणांनी या कामासाठी आम्हाला जोडले जावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.