अलिबाग (प्रातिनिधी) रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्यासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेला हरकती घेत शेकडो शेतकऱ्यांनी शाश्वत विकासाची मागणी केलीय. शासनाने मंजूर केलेला दर शेतकऱ्यांनी अमान्य केलाय. याबरोबरच विविध मागण्यांसाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकासमहामंडळाला शेतकरी संघर्ष समिती पेझारी धाकटे शहापूर विभागाचे वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले. संमती दर्शक भूसंपादन निवाड्याचा विकल्प केला असून 4 कोटी 80 लाख 894 हजार प्रति हेक्टरी दराची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. नियोजीत संपादित क्षेत्राबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केलाय.शासनाने मौजे शहाबाज येथील भूमी अधिग्रहण करिता एम आय डी सी ऍक्ट 1963 चे कलम 32 (2 नुसार सर्व भूमी पुत्रांना वैयक्तिक नोटिसा न बजावता परस्पर 33 (1) व 33 (4)नुसार भूसंपादन प्रक्रियेचा भंग केला असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
तर उद्योगधंदे आणि बाधित शेतकरी यांच्यात सामंजस्य करार करावा, स्थानिक भूमिपुत्र, सुशिक्षित तरुणांना वारसाहक्काने नोकरीत सामावून घ्यावे, व या मागण्यांच्या अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री यांच्याशी निर्णायक बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. विकसित भूखंडाची देखील मागणी करण्यात आलीय. याप्रकरणी जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला.