दिलीप भोईर यांच्या सह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश


महायुती म्हणून लढलो तर सर्व जागा आपल्याच
मंत्री भरत भोगावले यांचे प्रतिपादन

रायगड (प्रतिनिधी) : आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका युती म्हणून लढणार. मात्र सध्या सुरु असलेल्या वाकयुद्धामुळे वरिष्ठ मंडळी निर्णय घेतील. महायुती म्हणून लढलो तर सर्व जागा आपल्याच असतील. पुन्हा एकदा सगळीकडे भगवा फडकेल, असे प्रतिपादन रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केले.

भाजपाचे माजी रायगड जिल्हा उप अध्यक्ष दिलीप भोईर यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम अलिबाग येथील क्षत्रेक्य समाज सभागृहात पार पडला. त्याप्रसंगी मंत्री गोगावले बोलत होते.

दिलीप भोईर ह्यांनि आपल्या अनेक समर्थकांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी,जिल्ह्याध्यक्ष राजा केणी , दीपक रानवडे तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री गोगावले म्हणाले कि, माणसाचे घर मोठे नसले तरी चालेल पण मन मात्र मोठे असावे. माझ्या मनांत पाप नाही तर मी घाबरू कशाला अघोरी विद्या करून काही मिळवता आले असते तर कधीच मिळवले असते. असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना पक्ष वाढत आहे. जे स्वतः ला मालक समजत होते त्यांना आज घरी बसविण्याचे काम आमच्या आमदारांनी केले आहे, असे शेकापचे नाव न घेता मंत्री गोगावले म्हणाले. दिलीप भोईर त्यावेळी एकत्र असते तर आज महेंद्र दळवी हे मताधिक्याने १ नंबर वर गेले असते. दिलीप भोईर ह्यांची ताकद आम्ही बघितली आहे. कोणतेही काम ते निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करतात. त्यांचे पक्षात स्वागत आहे. त्यांचा योग्य तो मान राखला जाईल असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी महिलांसाठी अनेक योजना राबविल्या. या आधी कोणीही हे काम केले नाही, असेही मंत्री गोगावले ह्यांनी सांगितले.
आमदार महेंद्र दळवी ह्यांनी दिलीप भोईर ह्यांचे पक्षात स्वागत करून बेलगाम असणारा कार्यकर्त्या आज आमच्या पक्षात आला आहे. विधानसभेच्या वेळी त्यांनी अलिबाग मुरुड मतदार संघ पिजून काढला होता पक्षाने निवडणूक लढाऊ नका असे सांगूनही स्वतः च्या ताकदीवर माझ्या विरुद्ध निवडणूक लढवून ३३ हजार मते मिळवली. जनसामान्य माणसाने एवढा विश्वास दाखविणे साधी गोष्ट नाही. तळागातील माणसांसोबत काम करणारा माणूस आहे. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद वाढली आहे. आता जिल्हाधयक्ष राजा केणी आणि दिलीप भोईर हे दोघेही मिळून माझी जबाबदारी वाटून घेतील आणि आगामी निवडणुकीत आपलाच झेंडा सर्वत्र फडकत असेल असा विश्वास aआ. दळवी ह्यांनी व्यक्त केला. शेकापचे भविष्य हे तांडेल शिवाय आहे. फक्त खलाशी राहिले आहेत असा टोला हि त्यांनी लगावला. युतीमध्ये एकदिलाने काम केल्यास आपलाच विजय आहे. मात्र आमच्या कडे कोणी वाईट नजरेनं बोट दाखविले तर त्यांना त्यांची योग्य जागा दाखवू असेही तटकरे ह्यांचे नाव ना घेता त्यांनी सांगितले. आज योग दिनानिमित्ताने झालेला पक्ष प्रवेश हा चांगले फळ देईल असेही ते म्हणाले
दिलीप भोईर ह्यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर आपले मनोगत मांडताना म्हणाले कि, आम्ही दोघेही एकाच गुरुचे चेले आहोत. विधानसभेला त्यांच्या विरुद्ध लढलो तरी नियतीला ते मान्य नव्हते त्यामुळे माझा पराभव झाला आणि पुन्हा एकदा आमदार म्हणून महेंद्र दळवी निवडून आले. झाले गेले ते विसरून पुन्हा एकदिलाने काम करण्याची इच्छा असल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. जे काम देतील ते आनंदाने स्वीकारून ते पूर्णत्वास नेण्याचा कसोशीने प्रयत्न करणार आहे. आमदारांनीही आमच्या सारख्या कार्यकर्यांची लहान सहान कामे करावीत त्यांच्याकडे लक्ष द्यावे अशी विनंती ह्यावेळी त्यांनी केली.