बचतगटातील महिलांची गरुडझेप : २२८ महिलांनी तयार केल्या १ लाख ५६ हजार २० गणपती मूर्ती


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील विविध महिला बचतगटातील २२८ महिलांनी उमेद अभियान अंतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात पाऊल ठेवले आहे. या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. बचत गटातील महिलांनी १ लाख ५६ हजार २० गणपती मूर्ती तयार केल्या असून, यामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी बचत गटातील महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन केल्याने, जिल्ह्यातील महिला शक्ती गणपती मूर्ती व्यवसायात गरुड झेप घेऊ शकल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पेणमध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देश, विदेशात मोठी मागणी आहे. सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीवकाम, डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना स्वतची खास ओळख प्राप्त झाली असून, गणपती मूर्तींना गणेशमूर्तीना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या व्यवसायात पेण तालुक्यातील महिला बचतगट उतरले आहेत.

ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पेण तालुक्यातील विविध बचत गटातील २२८ महिला या गणपती व्यवसायात सहभागी झाल्या आहेत. महिला बचत गटांनी १ लाख ५६ हजार २० गणपती मूर्ती तयार‌ केल्या असून, यामधील १ हजार ५०० गणपती मूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या आहेत. गणपती मूर्ती व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. व्यवसायासाठी उमेद अभियान मार्फत महिला बचत गटांना फिरता निधी तसेच ग्राम संघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा करण्यात आला असून, महिलांच्या या व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे. या व्यवसायामुळे महिलांच्या हाताला काम मिळाल्यामुळे त्या अधिक सक्षम झाल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी केली पाहणी

पेण तालुक्यातील बचतगटातील महिला तयार करीत असलेल्या गणपती मूर्तींची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व जिल्हाधिकारी जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी केली. यावेळी त्यांनी या व्यवसायातील बारकावे जाणून घेतले. तसेच त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. गणपती मूर्ती व्यवसाय करणाऱ्या महिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिल्या.