अलिबाग (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातली राजकारणाची दिशा आता कुठे चालली आहे? डान्सबार प्रकरण, घोटाळे, अधिवेशनातील रम्मीचा खेळ, बेताल वक्तव्यं, हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण… आणि आता तर शोककळेच्या गावात नेत्यांच्या बायकांचा राडा!
मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात मंगळवारी सकाळी दरड कोसळून श्रीमती विठा मोतीराम गायकर (७५) यांचा जागीच मृत्यू झाला. गाव उद्ध्वस्त, वातावरण शोकाकुल, आक्रोश आणि हळहळ यामध्ये ग्रामस्थ दगडखचांतून आपले भविष्य वाचवण्याचा प्रयत्न करत असताना घटनास्थळी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी सौ. मानसी दळवी आणि शेकापच्या महाराष्ट्र प्रवक्त्या सौ. चित्रलेखा पाटील या पाहणीसाठी पोहोचल्या.
चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट सवाल करत विचारलं – “सत्ता तुमच्याकडे, प्रशासन तुमच्याकडे… मग अशा दुर्घटना घडतात तरी का? तत्परता कुठे होती?” या प्रश्नावर मानसी दळवी संतापल्या आणि थेट हात उचलला. पाहता पाहता दोन्ही महिला नेत्यांमध्ये उघडपणे हातापाई झाली. गावात मृत्यूचा आक्रोश होता… पण घटनास्थळावर सत्ताधाऱ्यांच्या बायकांचा ‘राजकीय तमाशा’ रंगला!
या प्रकारावर ग्रामस्थांचा संताप उसळला. लोकांनी संतप्त होत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं – “मृत्यूचा प्रसंग आहे आणि तुम्ही राजकारण करता? आम्हाला तुमच्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही. आम्ही व प्रशासन बघून घेऊ. लगेच इथून निघा!” असे जाहीरपणे ओरडून सत्ताधाऱ्यांना घटनास्थळावरून हाकलून दिलं.
दरम्यान, चित्रलेखा पाटील यांनी तत्काळ दखल घेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुरूड तालुका संघटिका राजेश्री मिसाळ यांना ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यासाठी लागेल ती मदत करतील व गावकऱ्यांच्या सर्व मागण्या शासनाकडून विना अटीशर्ती मान्य करून घेऊ असे ठाम आश्वासन दिलं.
दरड कोसळलली, गाव शोककळेत, जीव गेला, लोक भयभीत… पण सत्ताधाऱ्यांचा तमाशा थांबत नाही.