चिन्ह बदलले असले तरी मतदारांशी असलेले नाते कायम आहे, असा ठाम विश्वास भाजपच्या उमेदवार चित्रा पाटील यांनी व्यक्त केला. भाजपच्या ‘कमळ’ चिन्हासह त्यांनी प्रचार मैदानात उतरत विकासालाच आपला केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट केले. “मतदार माझेच आहेत, माणसं माझीच आहेत. चिन्ह बदलल्याने काहीही फरक पडणार नाही,” असे सांगत त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला.
सुज्ञ जनता विकास आणि गती यालाच प्राधान्य देईल, आणि त्यासाठी ‘कमळालाच कौल देईल,’ असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. विरोधकांवर टीका न करता आपले लक्ष केवळ विकासकामांवर केंद्रित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “विरोधक असणारच, पण माझा रोख फक्त आणि फक्त विकासावर आहे,” असा रोखठोक पवित्रा त्यांनी मांडला.
मतदारसंघात झालेली आणि प्रस्तावित विकासकामे, पायाभूत सुविधा, रोजगाराच्या संधी आणि भविष्यातील योजनांचा उल्लेख करत त्यांनी नागरिकांना योग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले. “हे मत विकासाला आहे, हे मत गतीला आहे. योग्य व्यक्तीलाच विजयी करा,” असे आवाहन चित्रा पाटील यांनी केले.
एकूणच, विकासाभिमुख राजकारण आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.









