अलिबाग (प्रतिनिधी): रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे रविवारी (दि.१मार्च) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानमार्फत संपूर्ण महाराष्ट्र,राज्यांमध्ये यशस्वीरीत्या स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी 37.5 टन कचरा गोळा करण्यात आला. अभियानामध्ये 2476 सदस्य सहभागी होते.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडामार्फत सातत्याने सामाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड आणि संवर्धन, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, दाखले वाटप, शैक्षणीक साहित्य वाटप, अंध व मुखबधीर विद्यार्थांना मदत. उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर, जनजागृती शिबीर, पाणपोई, आपतग्रस्तंना मदत यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. गेल्या काही वर्षापासून प्रतिष्ठानमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच्या या महान कार्याची पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दखल घेत त्यांनी जेष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब तथा दत्तात्रेय धर्माधिकारी यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली आहे.
१मार्च रोजी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडामार्फत राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात 32.30 किलोमीटर लांब रस्ते, तसेच 16787.06 चौरस मीटर सरकारी कार्यालये, रुग्णालये व इतर परिसर व 5 किलोमीटर समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता अभियानात 2,476 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. सदर अभियानातून एकूण 37.5 टन ओला व सुका कचरा संकलित करण्यात आला. जमा केलेला कचरा डंपिंग ग्राऊंड पर्यन्त नेण्यात आला.









