पहिले सव्वा वर्ष असणार भाजपचा अध्यक्ष तर शिवसेनेचा उपाध्यक्ष
अध्यक्षपदासाठी पेणचे भाजप आमदारपुत्र वैकुंठ पाटीलांचे नाव चर्चेत
शिंदे-गोगावले यांच्या प्रयत्नांना यश; पंचायत समित्यांतही महायुतीचे सत्ता वाटप
रायगड (खास प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून सुरू असलेला महायुतीतील तिढा अखेर मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर मिटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत रायगड जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या राजकीय वातावरणाला अखेर विराम मिळाला आहे.
रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला बाजूला ठेवून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्याने वाद निर्माण झाला होता. शिवसेनेकडून मात्र राज्यातील महायुतीप्रमाणेच जिल्ह्यातही युती टिकवावी यासाठी दबावतंत्र वाढवण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री उदय सामंत तसेच जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली होती.
अखेर मुंबईत झालेल्या बैठकीत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पहिला सव्वा वर्षांचा कार्यकाळ भाजपकडे राहणार असून उपाध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार आहे. त्यानंतर पुढील अडीच वर्षे शिवसेनेला अध्यक्षपद देण्यात येणार असून उर्वरित कालावधीत राष्ट्रवादीला संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यासोबतच जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्येही महायुतीतील पक्षांमध्ये पदांचे वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्हा परिषदेत भाजप पहिल्यांदाच सत्तेत येणार असल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांचे पुत्र वैकुंठ पाटील यांचे नाव सध्या चर्चेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.









