रांजणखार- डावली ग्रामस्थ आक्रमक
प्रांताधिकारी अलिबाग यांना दिले निवेदन
रायगड (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील रांजणखार- डावली गावालगत असणाऱ्या जमिनींमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता अनधिकृत भरावाची प्रक्रिया सुरु आहे. शासनाच्या प्रकल्पासाठी हा भराव केला जात असल्याचे ठेकेदार निधड्या छातीने सांगत आहे. केला जाणारा भराव न अनधिकृत असून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरु केलेला भराव अनधिकृत असून शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे. शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नसून शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे. काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराकडून केला जाणारा भराव थांबवून अनधिकृत भराव करणाऱ्या कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन डावली रांजणखार ग्रामस्थांनी अलिबागचे प्रांताधिकारी मुकेश चव्हाण यांना सादर केले.
रांजणखार- डावली गावालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या जागेत अनधिकृतपणे भराव सुरु केला आहे. हा भराव ऍफकॉन्स कंपनीने मेसर्स विनायक डेव्हलपर्स या कंपनीला दिला आहे. ज्या कंत्राटदाराला हा भराव करण्याचे काम दिले आहे. भरावाचे काम शासनाकडून घेणारी आणि भराव करण्यासाठी दिलेल्या मेसर्स विनायक डेव्हलपर्स यांनी ग्रामस्थांनी विश्वासात घेतलेले नाही. मेसर्स विनायक डेव्हलपर्स कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
शासनाच्या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीबाबत आणि त्या जमिनीवर भराव करण्याबाबतची कोणतीही पूर्वसूचना शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. ज्या जागेवर कंत्राटदार कंपनी भराव करीत आहे. त्यापैकी काही जागा सुपीक शेतीची असून काही जगन सीआरझेडच्या क्षेत्रात असल्याची माहिती मिळत आहे. सुपीक जागेवर भराव नेल्याने शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्मण होणार आहे. केल्या जाणाऱ्या भरावामुळे पाण्याचा निचरा होणारे स्रोत बंद होऊन गावात भरतीचए पाणी शिरून आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी रांजणखार डावली गावातील प्रकाश पाटील , विलास भागात, अविनाश पाटील, सुरज पाटील, प्रमोद पाटील, विक्रम पाटील, समीर म्हात्रे, नितीन म्हात्रे, नंदेश पाटील, सिद्धेश भगत, विलास पाटील, प्रियाल म्हात्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
**************
रांजणखार – डावली येथे शासनाच्या प्रकल्पासाठीचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांना सूचना देऊनच प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची आणि प्रकल्प उभारणाऱ्या शासकीय संस्थेची बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. यासाठी लवकरच बठकीचे आयोजन केले वाजणार आहे.
मुकेश चव्हाण
प्रांताधिकारी अलिबाग









