रायगड (प्रतिनिधी): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रस्तावित टोलवसुलीच्या मुद्द्यावरून कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, या निर्णयाविरोधात आता व्यापक जनआंदोलन उभे राहताना दिसत आहे. महामार्गाचे काम अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण असताना टोल आकारणी करण्याच्या हालचालींवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षांतील काही लोकप्रतिनिधींनीही या निर्णयाबाबत उघडपणे नाराजी दर्शवली आहे.
कोकणातील विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांनी “अपूर्ण रस्त्यावर टोल कशासाठी?” असा सवाल उपस्थित केला आहे. अनेक ठिकाणी महामार्गावर अद्याप खड्डे, अपूर्ण उड्डाणपूल, रखडलेली सेवा रस्त्यांची कामे आणि वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत टोलवसुली लादणे म्हणजे जनतेवर अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे.
राजकीय पातळीवरही हा मुद्दा तापू लागला आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवत, कोकणातील जनतेची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप केला आहे. तर सत्ताधारी पक्षातील काही आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनीदेखील जनभावनांचा आदर राखत टोलवसुलीचा निर्णय स्थगित करण्याची मागणी केली आहे. “महामार्ग पूर्ण दर्जेदार झाल्याशिवाय टोल घेऊ नये,” अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे.
दरम्यान, कोकणातील विविध भागांत बैठका, निवेदने आणि आंदोलनांची तयारी सुरू झाली असून, भविष्यात हा प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही संघटनांनी टोल नाक्यांवर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा दळणवळण मार्ग मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आधी दर्जेदार आणि सुरक्षित महामार्ग उपलब्ध करून द्यावा, त्यानंतरच टोलवसुलीचा विचार करावा, अशी सर्वसामान्यांची ठाम भूमिका आहे.
Home ताज्या बातम्या मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुलीविरोधात कोकणात संताप; राजकीय व सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया






