अलिबाग रायगड : अलिबाग तालुक्यातील मांडवा ते मुंबईतील गेटवे ही प्रवासी जलवाहतूक सेवा पावसाळ्यामुळे बंद झाली आहे. त्यामुळे मुंबई आदी शहरांतून अलिबागमध्ये मौजमजा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना घरी परतताना रविवारी (1 जून) तारेवरची कसरत करावी लागली. तासंतास रांगेत उभे रहावे लागल्याने महिला व लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. तर एसटी अतिरिक्त बसेस सोडताना अलिबाग एसटी बस स्थानक व्यवस्थापनाची सुद्धा चांगलीच दमछाक झाली.
रायगड जिल्हयातील पर्यटनाचा शेवटचा हंगाम सध्या सुरु आहे. जिल्हयातील समुद्र किनारपट्टी भागातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन येथे सध्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे. दरम्यान, यावर्षी पावसाळी वातावरणामुळे पर्यटनावर परिणाम झाला आहे. वादळीवारे आणि पावसाळी अलिबाग-मांडवा ते मुंबईतील गेटवे सेवा आधीच बंद झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे पर्यटनाच्या महत्वाच्या हंगामावर पाणी फेरले आहे. मात्र सध्या पावसाने मोठी उघडीप घेतली आहे. त्यामुळे शेवटच्या काही दिवसांसाठी मुंबई, ठाणे , पुणे आदी शहरातील पर्यटक अलिबागसह जिल्हयातील समुद्र किनार्यांवर पर्यटनासाठी दाखल झाले आहेत. अद्याप शाळांना सुट्टी असल्यानेही पर्यटकांची रेलचेल पुन्हा वाढली असून शनिवार आणि रविवारी जिल्हयातील अनेक पर्यटन स्थळांवर गर्दी होती. विशेष करून अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन येथील समुद्र किनार्यांवर पर्यटक मौजमजा करताना दिसत होते.
काही पर्यटक स्वत:च्या वाहनांनी तर काही एसटी बस सारख्या सार्वजनिक वाहनाने जिल्हयात दाखल झालेले आहेत. रविवारी दुपारनंतर पर्यटकांनी परतीचा प्रवास सुरु केला होता. त्यामुळे जिल्हयाबाहेर जाणार्या मार्गावर वाहनांची गर्दी दिसून आली. तर शेकडो पर्यटकांनी एसटी बसच्या प्रवासाला पसंती दिलेली दिसून आली. त्यामुळे अलिबाग एसटी बस स्थानकात रविवारी दुपारनंतर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. एसटी बसेस उपलब्ध होत नसल्याने पर्यटक तासंतास रांगेत उभे होते. अलिबाग एसटी बस स्थानकांतून पनवेलपर्यंत जास्तीत जास्त एसटी बसेस सोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. बस चालकांना अतिरिक्त फेर्या कराव्या लागत असल्याचे व्यवस्थापक राकेश देवरे यांनी सांगितले.

*********
दुपारनंतर हजारो पर्यटकांनी प्रवास सुरु केला होता. अलिबाग- पोयनाड मार्गावर सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तीनविरापासून पोयनाडपर्यंत वाहतूककोंडीत प्रवासी आणि पर्यटक अडकले होते.

**********
मांडवा ते गेटवे मुंबई जलवाहतुकी बंद झाल्याने अलिबाग एसटी बस स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अलिबाग-पनवेल मार्गावर जास्त अतिरिक्त बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र बहुतांश प्रवासी स्टॅडिंगऐवजी आसनाचा आग्रह धरत असल्याने नियोजन कठीण होत आहे. तसेच या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने प्रवासासाठी दीड तासाऐवजी दोन ते अडीच तास लागत आहेत.
– राकेश देवरे,
व्यवस्थापक, अलिबाग एसटी बस आगार










