प्रशासकीय यंत्रणांना धाब्यावर बसवत आरएमसी प्लांट सुरु
आरएमसी प्लांट विरोधात कावीर ग्रामस्थांसह अमित म्हात्रेंचा एल्गार
आरोग्यावर घाला घालणाऱ्या आरएमसी प्रकल्पाला विरोध
अलिबाग रायगड: रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीत अवैध आरएमसी प्लांट असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.मात्र त्यावर कारवाई होताना दिसत नाही.अशातच आता अलिबाग तालुक्यातील कावीर ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीर आणि अवैध आरएमसी प्लांटचे काम प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि अप्रामाणिकपणामुळे जोरात सुरु आहे.मागील २ महिन्यांपासून हा व्यवसाय तिथे सुरु आहे.या अवैध प्लांटमुळे स्थानिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे,जसे की प्रदूषण आणि वाहतूक कोंडी,गावातील लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्यामुळे ग्रामस्थ संतप्त आहेत.काही ग्रामस्थांनी यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.मात्र त्या तक्रारींना केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहेत.यामुळे कावीर ग्रामस्थांनी आरएमसी प्लांटच्या विरोधात एल्गार केला आहे.

गेल्या ६ महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय प्रदूषण नियंत्रण मंडळ,मुख्यमंत्री सचिवालय यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे अमित म्हात्रे यांनी सांगितले फुल पगारी मात्र बिन कामाचे अधिकारी अशी परिस्थिती सध्या रायगड जिल्हा प्रशासनाची झाली आहे.तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांना धाब्यावर बसवून आरएमसी प्लांट थाटात सुरु आहे.