मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन राज्य सरकार नवीन युवा धोरण तयार करत आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये युवा धोरण समितीच्या सदस्यांनी शासनाला शिफारसी सादर केल्या.
या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्ता भरणे, आ. प्रवीण दटके, आ. संतोष दानवे, आ. श्रीकांत भारतीय, आ. देवेंद्र कोठे, आ. सुहास कांदे, आ. प्रकाश सुर्वे, आ. रोहित पाटील, आ. वरूण सरनाईक, आ. सत्यजित तांबे, युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार मिलिंद भोई, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी शंतनू जगदाळे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी मनीष गवई, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी प्रवीण निकम, तसेच राज्य व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते उपस्थित होते.
तसेच इतर मंत्री, आमदार आणि समिती सदस्य उपस्थित होते. राज्यातील युवकांच्या कौशल्यविकास, रोजगार संधी, उद्योजकता, क्रीडा प्रोत्साहन, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना सुचवण्यात आल्या.
युवकांचे मत, गरजा आणि बदलत्या काळातील आव्हानांचा अभ्यास करून हे धोरण राबवले जाणार आहे. यासाठी राज्यभरातून अनेक स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, विद्यार्थी संघटना आणि युवकांशी थेट संवाद साधून सूचना मागवण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “हे धोरण केवळ दस्तऐवज न राहता, प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सक्षम असेल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी दिशा ठरेल.” उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही युवकांना केंद्रस्थानी ठेवून ठोस निर्णय घेण्यावर भर दिला.
राज्याचे नवीन युवा धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, त्यातून लाखो युवकांना नव्या संधी मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.









