अपूर्ण राहिला अजित पवार यांचा १२वा अर्थसंकल्प; सुनेत्रा पवार यांची विकासधोरणे पुढे नेण्याची ग्वाही


मुंबई (प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, अजितदादांच्या कारकिर्दीत सादर होणारा हा १२वा अर्थसंकल्प ठरला असता. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे राज्याने एक दूरदर्शी नेतृत्व गमावले. त्यांच्या पश्चात तयार झालेला हा अर्थसंकल्प त्यांच्या विचारांची आणि विकासदृष्टीचीच पुढची पायरी आहे.
अजित पवार यांचा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासावर ठाम विश्वास होता. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा त्यांचा ध्यास होता. औद्योगिक गुंतवणूक, पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्राचा विकास, रोजगारनिर्मिती आणि वित्तीय शिस्त यावर त्यांनी विशेष भर दिला होता. राज्याच्या महसुलात वाढ करतानाच सामान्य नागरिकांवरचा आर्थिक भार कमी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न कायम होता.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळाली. ग्रामीण भागातील विकासकामे, शेतकऱ्यांसाठी विविध योजना, तसेच उद्योगस्नेही धोरणे यामुळे महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनत होता.
सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, अजितदादांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राज्याच्या प्रगतीचा वेग कायम राखला जाईल. आगामी अर्थसंकल्पात विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता यांना प्राधान्य देण्यात येणार असून महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू राहील.