रायगड (प्रतिनिधी): राज्यात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तज्ञांकडून आणि प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. योग्य काळजी घेतल्यास उष्णतेच्या त्रासापासून स्वतःचे संरक्षण करता येऊ शकते.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तहान नसली तरी दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच सुती व सैलसर कपड्यांचा वापर करावा, ज्यामुळे शरीराला उष्णतेचा त्रास कमी होतो. विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, कारण या वेळेत सूर्याची किरणे सर्वाधिक तीव्र असतात.
बाहेर जाण्याची गरज असल्यास डोक्यावर टोपी, गॉगल किंवा छत्रीचा वापर करणे आवश्यक आहे. घरातील दरवाजे व खिडक्यांमधून दुपारच्या वेळी थेट सूर्यप्रकाश येणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी. यामुळे घरातील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
आहारातही बदल करणे तितकेच महत्त्वाचे आहे. काकडी, टरबूज, खरबूज, लिंबूपाणी, ताक आणि नारळपाणी यांसारख्या थंड व पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. दुसरीकडे, कार्बोनेटेड पेये आणि कॅफीनयुक्त पेये टाळण्याचा सल्ला दिला जात आहे, कारण यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता वाढू शकते.
तापमानात होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उष्माघातासारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी विश्रांती घेणे आणि शरीर थंड ठेवणे आवश्यक आहे.
नागरिकांनी या सूचनांचे पालन करून स्वतःचे आणि कुटुंबियांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






