साळावपासून ताडगावपर्यंतच्या विहिरींमध्ये एका व्यक्तीने विष टाकल्याचा संशय ; पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल
रेवदंडा अमुलकुमार जैन :रायगड जिल्ह्यातील साळाव रोहा रस्त्यावरील ताडगाव येथील विहिरीमध्ये विष टाकल्याचा संशय निर्माण झाल्याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात अखलाक अयुब खान(वय 47 वर्षे), व त्यांची पत्नी रेश्मा अखलाक खान(वय 47 वर्षे) दोन्ही सध्या रा. परशुराम बिल्डिंग, रूम नं.301, सेक्टर 23, नेरुळ सी वूड्स दारवे, नवीमुंबई, मुळ रा. केळशी, दाभोळ जि.रत्नागिरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रेवदंडा पोलिस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,अखलाक अयुब व खान व रेश्मा अखलाक खान या दांपत्याची मुलगी सादिया अखलाक खान (वय 23 वर्षे) हिचे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तुर्भे येथील एका मुलासोबत प्रेमसंबंध आहेत परंतु सदर मुलाशी लग्न करुन देण्यास सदर इसम आणि त्याची पत्नी यांचा विरोध आहे पण त्यांची मुलगी त्याच मुलाशी लग्न करण्यासाठी तगादा लावत आहे . मात्र आई वडील हे आपल्याला पसंत असलेल्या मुलाबरोबर लग्न लावून देत नसल्याने सादिया अखलाक खान हिने यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला होता . म्हणून अखलाक खान याने कल्याण येथे असणारा कोणीतरी मांत्रिक/मौलवी याचेकडे याबाबत उपाय काय करावा जेणेकरून त्याची सादिया ही त्याचे प्रेम संबंध असणाऱ्या मुलासोबत संबंध तोडून टाकेल म्हणून सदर मांत्रिक याने अखलाक खान याला 21 विटा घेऊन त्यावर अल्ल्हा चे नाम लिहून मंत्रतंत्र करुन देऊन ते 21 विहिरीत टाकण्याबाबत सांगितले त्यावरून अखलाक खान याने काही विटा नेरुळ नवी मुंबई येथे विहिरीत टाकल्या होत्या मात्र अखलाक अयुब खान व रेश्मा अखलाक खान हे दोघेजण मुरुड तालुक्यातील मेव्हणीचे लग्न कार्य मुरुड तालुक्यातील मौजे चोरढे ता मुरुड येथे असल्याने आलेले होते. यावेळी त्यांनी रेवदंडा येथे उतरवून भाड्याने रिक्षा घेतली आणि साळाव येथून चोरढे येथे जात असतांना रस्त्यात येणाऱ्या विहिरीमध्ये कल्याण येथील मांत्रिकाने मंतरुन दिलेल्या विटा टाकत जात असताना ताडगाव येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीत विट टाकत होता. त्यावेळी ग्रामस्थांनी अखलाक अयुब खान यास विचारणा केली मात्र त्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ना पटल्याने ग्रामस्थानी तातडीने रेवदंडा पोलिस ठाण्यास माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी पोहचून त्यांनी खान दांपत्य यांना ताब्यात घेऊन चौकशी साठी रेवदंडा पोलिस ठाण्यात आणले.
अखलाक खान बाबत याने मांत्रिक यांच्या सांगण्याप्रमाणे केलेल्या कृतीबाबत ग्रामस्थांमध्ये विहिरीत घातपाताच्या उद्देशाने विष टाकल्याच्या संभ्रम निर्माण झाला असल्याने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस महेश मोहिते, कोर्लई सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ यांच्या सहित मुरुड तालुक्यातील ताडगाव व परिसरात असलेल्या गावातील शेकडो ग्रामस्थ यांनी रेवदंडा पोलिस ठाण्याबाहेर एकत्र जमून त्यांनी अखलाक खान याने सार्वजनिक पाण्याचे विहिरीत विष टाकले आहे किंवा कसे या शंकेचे निरसन करून देणेबाबत व गुन्हा दाखल करणेबाबत मागणी लावून धरली होती आणि तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही अशी भूमिका घेतली.
तेव्हा ग्रामस्थांच्या मनातील शंका दूर करण्याकरिता रेवदंडा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत किरवले यांनी सदर विहिरींतील पाणी ग्रामस्थाना पिऊन दाखवले तसेच अखलाक खान याने देखील सदर पाणी पिऊन दाखवले.
तसेच मुलीचे असलेले प्रेम संबंध तुटावे यासाठी मांत्रिकाचा आधार घेत अंधश्रद्धा याला खत पाणी घातल्या विरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यावेळी रेवदंडा पोलिस स्टेशन आवारात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा होऊन संतप्त झाले होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या सूचनेनुसार पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग मुख्यालय मुरुड येथून अधिक पोलिस कर्मचारी यांची कुमक मागविण्यात आली होती.
यावेळी पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांनी जमलेल्या ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन देत शांत केले.









