रायगड (प्रतिनिधी) : भात लागवडीचा हंगाम सुरू असतानाच रायगड जिल्ह्यात युरिया खताच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. भात लागवड पूर्ण करून पिकाला आवश्यक खताची गरज असताना अनेक ठिकाणी युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी रायगड जिल्हा कृषी विभागाला थेट इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून, मेहनत करून भाताची लागवड केली आहे. आता पिकाला युरियाची गरज असताना बाजारात आणि उपलब्ध वितरण केंद्रांवर युरिया मिळत नसेल, तर शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी उपस्थित केला.
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. युरियाच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.
“येत्या दोन दिवसांत रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध झाला नाही, तर आम्ही थेट कृषी कार्यालयात जाऊ. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना स्टाईलने जाब विचारू,” असा आक्रमक इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी दिला.
युरिया खताच्या तुटवड्यामुळे भात पिकावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी विभागाने उपलब्ध साठा, वितरण व्यवस्था आणि तालुकानिहाय मागणी यांचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांना सुरळीत खतपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या इशाऱ्यानंतर आता रायगड कृषी विभाग याबाबत कोणती भूमिका घेतो आणि शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून देण्यासाठी कोणती पावले उचलतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





