सलग सुट्टीत कोकण किनारपट्टीवर पर्यटकांची प्रचंड गर्दी; अलिबागसह सर्व बीच तुडुंब गजबजले


रायगड (प्रतिनिधी): सलग सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोकण किनारपट्टीकडे मोठ्या प्रमाणावर धाव घेतली असून अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारे अक्षरशः गजबजून गेले आहेत. विशेषतः अलिबाग, नागाव, वरसोली, काशिद, मुरुड आणि श्रीवर्धन या प्रसिद्ध बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर भागांतून हजारो पर्यटक कुटुंबासह आणि मित्रपरिवारासह कोकणात दाखल झाले आहेत. सुट्टीचा फायदा घेत अनेकांनी समुद्रकिनारी निवांत वेळ घालवणे, जलक्रीडा, बोटिंग, तसेच स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे पसंत केले. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठा चालना मिळाली आहे.
हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे जवळपास फुल्ल झाले असून अनेक ठिकाणी आगाऊ बुकिंगशिवाय राहण्याची सोय मिळणे कठीण झाले आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाने लाईफगार्ड, पोलीस बंदोबस्त आणि सूचना फलकांची व्यवस्था केली आहे.
पर्यटकांनी स्वच्छतेचे भान राखून प्लास्टिकचा वापर टाळावा, तसेच समुद्रात उतरताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.