अलिबाग (जिमाका) : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भिम पदयात्रेचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि प्रख्यात कायदेतज्ञ असून त्यांनी भारतीय संविधानाद्वारे स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्यायाचा भक्कम पाया रचला. संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून त्यामागे त्यांच्या कार्याचा मोठा वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “सामाजिक समता सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत दि. १४ एप्रिल रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेपर्यंत भिम पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेत समाज कल्याण व इतर मागास बहुजन कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. तसेच अलिबाग येथील मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त करून दिले.
यावेळी आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच भारतीय संविधानाचे वाचन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे आणि माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कार्यालय अधीक्षक माधुरी पाटील, इतर कर्मचारी उपस्थित होते.






